मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू राज्यातील राजकारणात पुन्हा एकत्र यावेत यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी मुंबईतील एका मराठी माणसाने या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून बंधू मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. पण या दोन्ही भावांनी अद्याप एकत्र येण्यास तयारी दर्शवली नाही.
मोहनिश रवींद्र राऊळ नावाच्या व्यक्तीने गुढीपाडव्यानिमित्त ठाकरे बंधूंच्या मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्धव व राज ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘ स्मृतिस्थळावर मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे, अशी विनंती केली जाणार आहे. राऊळ यांनी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावरही ठेवली आहे.
काय म्हटले आहे निमंत्रण पत्रिकेत?
मोहनिश राऊळ यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे की, बंधू मिलन निमंत्रण… भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम येत्या ३० मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ घेण्यात येणार आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची. गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल.
सर्वकाही विसरून एकत्र या
ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील मराठी माणसाला मोठे बळ मिळणार असल्याची भावना मोहनिश राऊळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आज होळीचा सण आहे, सर्वकाही विसरून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. भाऊच भावासाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची व एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे.