पुणे : पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील ज्या भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरविले जाते, त्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर अन्य ठिकाणी गेल्यास त्याची पूर्णतः जबाबदारी आता संबधित कर्मचाऱ्यांवर असणार आहे. या निर्णयामुळे टँकरमधून होणाऱ्या पाणी चोरीचे प्रकार रोखले जाणार, अशी महापालिकेला आशा आहे.
शहरामध्ये ज्या भागांना महापालिकेच्या वतीने पाणी दिले जात नाही, अशा भागात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाण्याचे टँकर दिले जातात. या टँकरना ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ (जीपीएस) बसविण्यात आली असून या यंत्रणेद्वारे टँकरवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठीचा लॉग-इन आणि पासवर्ड पाणीपुरवठा विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. या अधिकाऱ्यांकडे या कामाव्यतिरिक्त अन्य अनेक कामे असल्याने त्यांना या कामाकडे लक्ष देणे शक्य होत नव्हते.
तसेच टँकरसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर सुद्धा अनेक टँकरचालक महापालिकेचे पाणी संबधितांना पोहचत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे येत आहेत. टँकरवर लावण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेचा वापर होत नसल्याने महापालिकेचे पाण्याचे टँकर नेमके कुणीकडे जातात , याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळत नाही. त्यामुळे जीपीएस यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबधित क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे देण्यात यावी. अशी मागणी स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली असून त्यांना लाॅग-इन आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे. टँकर कुठे आणि कधी पाठविण्यात आले, याचा दैनंंदिन अहवाल संबधितांकडून घेतला जाणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.