उरुळी कांचन, (पुणे) : सहजपुर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील माकर वस्ती परिसरात खेळत खेळत कालव्याच्या पाण्यात उडी मारलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिक तरुणाच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र एकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे.शनिवारी (ता. 19) सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
असीम जावेद मुजावर (वय- 3) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर मेहक जावेद मुजावर (वय -7),व रूहान जावेद मुजावर वय – 5) असे वाचवण्यात आलेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचे मुले व त्यांचे आई वडील हे सहजपुर ग्रामपंचायत हद्दीतील कालव्याच्या परिसरात राहतात. शनिवारी सकाळी तिघेही कालव्याच्या बाजूला खेळत होती. यावेळी खेळत खेळत तिघांनीही कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या.
या मुलांनी कालव्यात उडी मारल्याचे परिसरात राहणाऱ्या निलेश रामदास खोमणे यांच्या पत्नीने पाहिले. व मुलांनी पाण्यात उड्या मारल्या म्हणून आरडाओरडा सुरू केला. यावेळी घरात असलेल्या निलेश खोमणे यांनी तात्काळ पळत जाऊन पाण्यात पडलेल्या दोघांना वरती काढले.
दरम्यान, या दोन मुलांना पाण्यातून वरती काढेपर्यंत असीम हा पाण्यात बुडाला होता. त्याचा शोधाशोध घेतला मात्र आढळून आला नाही. कालव्याच्या परिसरात नागरिक व यवत पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता. कालव्याच्या एका बाजूला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून यवत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे