इंदापूरः इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून तीन महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेचा पती आणि त्याच्या मित्राने खून केल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह ढेकुगाव ते परधाडी (ता. नांदगाव, जि. नाशिक) घाटात टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रियंका जोतीराम करे (वय २६, रा. कळाशी, ता. इंदापूर) असे दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. जोतीराम आबा करे (वय ३४, रा.कळाशी ता.इंदापूर), दत्तात्रय शिवाजी गोलांडे (रा.गोलांडेवस्ती, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी २०२५ रोजी प्रियंका करे ही बेपत्ता झाल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर २३ एप्रिल २०२५ रोजी हवालदार सुधीर भीमराव काळे यांनी फिर्याद दिली. प्रियंकाचे लग्न जोतीराम याच्या सोबत झाले होते. जोतीराम हा सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तुझे वागणे बरोबर नाही. त्यामुळे आमची नातेवाईक व जनमानसात बदनामी होत आहे, असे म्हणून छळ करायचा.
त्यानंतर जोतीरामने तिचा खून करण्याचे ठरविले. २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी जोतीराम करेने गळा दाबून पत्नी प्रियंकाचा खून केला. यानंतर त्याने त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे याला बोलवून घेतले. या दोघांनी तिचे प्रेत चार चाकी वाहनात टाकून २८ जानेवारीच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकुगाव ते परधाडी घाटात फेकून देऊन पुरावा नष्ट केला, असे फियार्दीत नमूद करण्यात आले आहे.