उरुळी कांचन, ता. 06 : उरुळी रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा. तसेच मागील पाच वर्षांहून अधिक काळ झाला तरी लोणावळा – दौंड लोकल सुरू झाली नाही. ती या एप्रिल पासून सुरू करावी अशा मागण्यांचे निवेदन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले आहे.
कोरेगांव मुळ (ता. हवेली) येथे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या जॅकवेलची पाहणी करण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी उरुळी कांचन शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार), उरुळी कांचन प्रवाशी संघ व उरुळी कांचन ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिरूर – हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, उरुळी कांचन शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) अध्यक्ष रामभाऊ तुपे, प्रवाशी संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, उरुळी कांचनचे माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, युवकाध्यक्ष आप्पासाहेब वाघमोडे, यशवंतचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून प्रवासी संघटनेच्या कामगारांच्या व ग्रामस्थांच्या माध्यमातून शिरूर हवेलीच्या लोकप्रतिनिधींकडे उरुळी रेल्वे स्टेशनवर कामगारांच्या, विद्यार्थ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली जात आहे. पुणे-दौंड लोहमार्गाला उपनगरीय रेल्वे लोहमार्गाचा दर्जा द्यावा. त्यामुळे लोणावळा – दौंड लोकल सुरु करणे हितावह होईल अशा मागण्या सातत्याने करून देखील, लोकसभेमध्ये या भागाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खासदारांना या मागण्यांचा पाठपुरावा करून तो सोडवण्यासाठी वेळ मिळाला आहे किंवा नाही का त्यांची याबाबत मानसिकताच नाही हे समजणे अवघड झाले आहे.
दरम्यान, या मागण्याच हे लोकप्रतिनिधी पुढे रेटत नसतील तर त्या मंजूर कशा होणार? यावरुनच त्यांची सर्वसामान्य जनतेप्रती असलेली आस्ता समजून येत आहे. ते जर आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या महत्त्वाच्या मागण्या लोकप्रतिनिधी या नात्याने केंद्र सरकारकडून सोडवून घेण्यासाठी अपयशी ठरत असतील तर अशा लोकप्रतिनिधींनी खासदारकीची जागा अडवू नये, ज्याला खरेच काम करायचे आहे अशांसाठी या जागा रिकाम्या करून द्याव्यात अशा प्रकारची भूमिका या परिसरातील जेष्ठ, व सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.
“उरुळी कांचन भागातून वाढणारी प्रवासी संख्या विचारात घेता या ठिकाणी लोकल रेल्वे सेवा उपलब्ध होणे काळाची गरज आहे. शहराजवळील भागाला उपनगरीय सेवा देऊन उपनगरांचे कनेक्टिंग वाढविले आहे. पुणे विभागाने पुणे ते दौंड उपनगरीय सेवा उपलब्ध करण्याचे पाऊल उचलले पाहिजे. उरुळी कांचन व दौंड भागाकडे वाढणारे नागरीकरण पाहता ही सेवा रेल्वेने जलदगतीने उपलब्ध करावी”.
प्रकाश जगताप, अध्यक्ष, उरुळी कांचन प्रवासी संघ