Champions Trophy 2025 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 46.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आहे. टीम इंडियाने 231 धावा केल्या आणि विजय साकार केला. उपकर्णधार शुबमन गिलच्या नाबाद शतकी खेळीने सर्वांचे मनं जिंकली. तर केएल राहुल याने शुबमनला चांगली साथ देत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
टीम इंडियाची बॅटिंग
कर्णधार रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र रोहित बहरात असताना 41 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला आणि टीम इंडियाने 69 धावांवर पहिली विकेट गमावली. रोहितनंतर विराट मैदानात आला. परंतु विराट जास्त वेळ तग धरू शकला नाही. विराट 38 बॉलमध्ये 22 रन्स करुन आऊट झाला.
विराटनंतर टीम इंडियाच्या ठराविक अंतराने विकेट्स जात राहिल्या. श्रेयस अय्यर 15 आणि अक्षर पटेल 8 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियाची 30.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 144 अशी बिकट स्थिती झाली. टीम इंडिया अडचणीत सापडली असताना मात्र शुबमन आणि केएल राहुल या दोघांनी डाव सावरला आणि भारताला विजय मिळवून दिला.
शुभमन गिलची शतकी खेळी…
उपकर्णधार शुबमन गिलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 129 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह नाबाद 101 धाव केल्या. या दरम्यान त्याने कमालीची एकाग्रता दाखवली आणि परिस्थिनुरुप आपली खेळी पुढे नेत शतकासह संघाला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. तर केएलने 47 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 41 धावा केल्या. बांगलादेशकडून रिषाद हौसेन याने 2 विकेट्क घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेशची बॅटिंग..
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला स्वस्तात गुंडाळलं आहे. बांगलादेशला भारतीय गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने बांगलादेशला 49.4 ओव्हरमध्ये 228 धावांवर सर्व बाद केले. तॉहिद हृदॉय याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 220 पार धावा करता आल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 229 धावांचं आव्हान मिळालं होतं जे भारताने पूर्ण करून विजय मिळवला.
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला खरा परंतु हा निर्णय बांगलादेशच्या अंगलट आलेला दिसून आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला झटपट 5 धक्के देत फलंदाजांची हवा काढून घेतली. सौम्य सरकार, कॅप्टन नजमूल हुसैन शांतो आणि मुशफिकर रहीम या तिघांना भोपळाही फोडू न देता माघारी पाठवलं. तर मेहदी हसन मिराजने 5 आणि तांझिद हसन याने 25 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे बांगलादेशची 5 बाद 35 अशी बिकट स्थिती असताना मात्र त्यानंतर तॉहिद हृदाय आणि जाकेर अली या दोघांनी सहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी करत संघाला 229 पर्यंत नेऊन ठेवलं.
बांगलादेशसाठी तॉहिदने सर्वाधिक धावा केल्या. तॉहिदने 118 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 100 धावा केल्या. तॉहिदचं हे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं आहे. तर रिशाद हौसेन याने 18 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने 53 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने तिघांना आऊट केलं. तर अक्षर पटेल याने दोन बळी घेतले.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.