लोणी काळभोर, ता. 7 : ग्रामीण भागात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत होती. मात्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फॉर्म भरून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्यात आले आहेत. या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात सुटसुटीतपणा येणार आहे. याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून खालील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात आली आहे.
दरम्यान, अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना एका वेळी एकच प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच शाखेकरिता अर्ज करता येईल. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर उपलब्ध असेल. सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून अकरावीचे ऑनलाइन प्रवेशाकरिता चार फेऱ्यांचे नियोजन दहावीच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. दहावीची टक्केवारी पाहून योग्य पद्धतीने कला, वाणिज्य व विज्ञान यापैकी योग्य शाखाची निवड करून कॉलेजच्या नावाची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. अशी माहिती प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.