पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यापासून मुंडे यांच्या अडचणी वाढतच गेल्या. वाल्मीक कराड सोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला.अखेर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडेनी आपला राजीनामा पीए द्वारा मुख्यमंत्र्यांच्याकडे सुपूर्द केला. या राजीनाम्यावरून आता खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. राजीनामा केवळ नाटक आहे, पुढच्या सहा महिन्यात धनंजय मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सरकारकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सर्व नाटक आहे. त्यांना पुढच्या 6 महिन्यात परत राज्यमंत्री मंडळात घेतलं जाईल .धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अतिशय जवळचे समजले जातात. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होवू शकतो अशी ही चर्चा आहे. शिवाय राजीनामा घ्यायचा होता तर आधीच का घेतला नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सरकारवर शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागा अन्य कुणाला दिली जाणार आहे का? की ही जागा रिक्त ठेवून योग्य वेळी ती भरण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पुढच्या सहा महिन्यानीं धनंजय मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केले जाईल असं वक्तव्य काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.