PMPML News: पुणे, ता: 14: रेल्वेच्या युटीएस ॲपच्या धर्तीवर पुणे पीएमपीएमएलने प्रवाशांना आधुनिकतेचा फिल देण्यासाठी मोबाईलवरून तिकीट काढण्याचे ॲप सुरू केले खरे, पण सध्या हे ॲपच महामंडळाचा तोटा वाढवण्यास हातभार लावत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. त्यामुळे ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप वापरा (apli pmpml app) आणि स्मार्ट व्हा, या ऐवजी पीएमपीएमएलचा तोटा वाढवा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
लाखो पुणेकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या पीएमपीएमएलने आधुनिकीकरण स्वीकारून प्रवाशांच्या सोयीसाठी आपली पीएमपीएमएल” मोबाईल ॲप सुरू केले. त्याचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, महामंडळाच्या दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते झाले आणि ७ ऑगस्ट २०२४ पासून प्रवाशांसाठी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले. त्यानंतर आजतागायत ५ लाखांवर पुणेकरांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. प्रवाशांना या सुविधेचा फायदा होत असला तरी, त्यातील त्रुटीमुळे सध्या हे ॲपच महामंडळाचा तोटा वाढवत आहे.
कसे होते नुकसान?
या संदर्भात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन या कर्मचारी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला पत्र आणि निवेदने देऊन त्यातील त्रुटी लक्षात आणून दिलेल्या आहेत. या ॲपमधून प्रवासी तिकीट काढताना हे ॲप प्रवासाचे करंट लोकेशन (चालू ठिकाण) मोबाईलमध्ये कव्हर करते. त्यानंतर पुढील प्रवासाचे तिकीट या ॲपमधून घेतले जाते.
मात्र बसमधला प्रवासी ॲपमधून तिकीट प्रोसेस करेपर्यंत बस एक-दोन थांबे पुढे गेलेली असते. पीएमपीएलच्या ॲपमध्ये स्टेजनुसार तिकीट दर सेट केल्यामुळे साहजिकच कमी दराचे तिकीट निघते. परिणामी तितका तोटा पीएमपीएलला सहन करावा लागतो. त्यामुळे हे ॲप डेव्हलपरला पोसण्यासाठीच आहे का? असा सवाल कर्मचारी संघटनेने केला आहे.
प्रवासी या प्रकारापासून अनभिज्ञ
ॲप वापरताना कमी तिकीट निघाले, तर त्यात प्रवाशांचा काहीच दोष नसतो, कारण बसमध्ये चढल्यानंतर गर्दीतून मोबाईल ॲप सुरू करणे आणि तिकीट काढण्यासाठी त्याला किमान दोन ते तीन मिनिटे लागतात. या प्रक्रियेत स्वाभाविकपणे बस पुढे गेलेली असते. पण हे प्रवाशांच्या लक्षात येत नाही. प्रवासी आमचे दैवत असून प्रशासनानेच ही त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
चुक झाल्यावर ॲपचे कराल का निलंबन?:
यासंदर्भात पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे शहराचे अध्यक्ष नागेश गायकवाड यांनी सांगितले की आमचा आधुनिकीकरणाला विरोध नसून होणाऱ्या नुकसानीला आहे. शेवटी महामंडळाचा फायदा झाला, तरच कर्मचाऱ्यांचा होणार आहे. म्हणून आम्ही हा प्रश्न उपस्थित करत आहोत. याआधीही वेळोवेळी यासंदर्भात पत्र व्यवहार केला आहे. ॲपमधून बरेचदा दहा रुपयांऐवजी पाच रुपयांचे तिकीट निघते. पण हेच पीएमपीएलच्या वाहकाकडून चुकून झाले, तर त्याला तत्काळ निलंबित केले जाते. तशी ॲपवरही कारवाई करणार का? असा सवालही श्री. गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.