अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारनं पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन केलं. या कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे.
आज पार पडलेल्या बैठकीत चौंडीचे स्मृतीस्थळ जतन आणि संवर्धन करण्यासाठी 681 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी रुपये, तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटी रुपये, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटी रुपये, सोबतच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी 829 कोटी रुपये, असे एकूण 5 हजार 520 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. यातून विविध प्रकारची कामे येथे होतील आणि अखिल भारतीय स्तरावरचं एक प्रेरणास्थान म्हणून ही ठिकाण पुढे आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न सरकार करणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या…
1) आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जीवनकार्य जगासमोर आणण्यासाठी बहुभाषिक चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय
2) मुलींसाठी आदिशक्ती अभियान सरकार राबविणार
3) अहिल्यानगरमध्ये खास मुलींसाठी आयटीआय केंद्र
4) अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय कॉलेज उभारणार
5) धनगर समाजातील दहावीच्या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, पुणे आणि नागपूरला सुरू होणार
6) धनगर समजतील विद्यार्थ्यांना इंग्रजीत शिकण्यासाठी यशवंत विद्यार्थी योजना, एकूण 10 हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
7) पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेल्या विहीरींचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय
देशामध्ये जे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आहे. तेच कार्य त्यांच्या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.