बीड: बीडमधील शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चांगले पर्जन्यमान असूनही सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे बीड मधील शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. या आर्थिक विवंचनेतून सुटका करून घेण्यासाठी अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सरकारीच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात सरासरी दर 30 तासाला एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 1 जानेवारी ते 25 एप्रिल 2025 या 115 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात तब्बल 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
बीड जिल्ह्यात विविध कारणांमुळे वाढलेले कर्ज हे शेतकरी आत्महत्येच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे. मागील वर्षी म्हणजेच 2024 साली बीड जिल्ह्यात एकूण 205 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली होती. त्यापैकी 175 आत्महत्या सरकारी मदतीस पात्र ठरल्या आहेत. ही माहिती महसूल विभागाने विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.