उरुळी कांचन(पुणे) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे.
दरम्यान पर्यटनासाठी गेलेल्या उरुळी कांचन येथील समशेर शेख यांनी या हल्ल्याबत आपला अनुभव कथन केला आहे. त्यांनी सांगितले की, घटना घडली त्या ठिकाणापासून अलीकडे ७ किलोमीटर अंतरावर आम्ही होतो. आमच्या ग्रुपमधील एका इनोव्हा चालकाने प्रसंगावधान राखत फोन केला आणि आम्हास जागेवरच थांबायला सांगितले.
पहलगाम पर्यटनासाठी गेलेले समशेर शेख (उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे) हे त्यांची पत्नी शाईन, मुलगा सिद्दिक हे श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. गेल्या पाच दिवसांपूर्वी ज्योती झुरुंगे या महिलेने एकूण ७० नागरिक पर्यटनासाठी सर्व व्यवस्थापन करून जम्मू काश्मीरला नेले होते. हे सर्वजण रेल्वेने जाऊन तेथील स्थानिक चार चाकी वाहनाने पर्यटन स्थळ पाहत होते. २५ एप्रिलला त्यांचे रेल्वेची परतीची तिकिटे आरक्षित आहेत.
समशेर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ७० पर्यटक हे शिरूर, दौंड आणि हवेली तालुक्यातून गेलेले होते. ग्रुप तयार करून चार चाकी वाहनामध्ये पर्यटन स्थळ पाहायला निघाले असताना दहशवादी हल्ला झाल्याची घटना घडली. त्या ठिकाणापासून शेख हे अवघे सात किलोमीटर अलीकडे अंतरावर होते. तसेच त्यांच्याच ग्रुपमधील एक गाडी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. जेव्हा घटना घडली त्या ठिकाणापासून लोकांची धावपळ व चारचाकी गाड्या थांबल्याचा अंदाज त्या गाडीच्या चालकाला आला. त्यावेळी दुसऱ्या गाडीच्या शेजारी थांबलेल्या एका गाडीतील ड्रायव्हरने लगेचच खुणावले आणि परत फिरण्यास सांगितले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील गाडीच्या चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले.त्यानंतर लगेचच आम्ही असलेल्या गाडीच्या चालकाला फोन करून सांगितले की, पुढे येऊ नका. या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे.
आम्ही गाडी जागेवरच थांबवली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्सवरती सुरक्षित पाठवल्या. आमच्या पुढच्या ग्रुपमधील वाहनचालकाने फोन करून माहिती दिल्यामुळे आम्ही बचावलो व पुढील अनर्थ टळला. माझा कुटुंबाशी संपर्क सुरु आहे. आम्ही सुरक्षित आहोत. मला माझे वडील अब्दुल गफूर व आई सलीमा शेख यांनी संपर्क असून आमचे बोलणे झाल्यानंतर ते सर्व चिंतामुक्त झाले, असे शेख यांनी म्हटले आहे.