पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: सध्या उन्हाळा सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ सुरु आहेत. लग्न समारंभ सुरु असताना वधू व वर या दोन्ही बाजूच्या मंडळींनी आपल्या मुला-मुलींना लहानाचे मोठे करून वाढवलेले असते. त्यामुळे आपल्या मुलांचा लग्न समारंभ दिमाखात व्हावा म्हणून प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसतो. परंतु, लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत व मोठ्या लोकांचे स्टेजवर नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का…?
‘ते’ म्हणजे वेळात वेळ काढुन आलेले असतात आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का..? अशी उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते. तसेच अशा प्रथा बंद करायला हव्यात, असे काहींचे म्हणणे आहे.
प्रतिष्ठित नागरिक असोत की पुढारी, कुणाचेही शब्दसुमनांनी स्वागत करणे हेही बंद केलं पाहिजे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करायला हवे. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्च करून दूर गावावरून येणारे हॉलमधील सर्व समाजबांधव, आत्पेष्ठ, नातेवाईक, सगेसोयरे सगळेच अप्रतिष्ठीत असतात का..?
निमंत्रणाचा स्वीकार करून वधु- वरांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकजण आपापली महत्वाची कामे सोडून माणुसकीच्या नात्यात उपस्थित झालेले असतात. जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात. तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे, अशी चर्चा ऐकायला मिळते. वधू-वरांचे नातेवाईक त्यामध्ये मामा, काका, आत्या, मावशी, बांधव इतर नातेवाईक मित्र मंडळी, जे गरीब आहेत. परंतु, तुमच्या लग्न कार्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थिती दाखवतात ते नातेवाईक महत्त्वाचे नाही का?
खोट्या प्रतिष्ठेपायी आपण गरीब असलेले आपले नातेवाईक यांची अवहेलना करत नाही का.?
उपस्थित असणारी प्रतिष्ठित माणसे, ज्यांना फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांची वाहवा करतात. ते फक्त फोटो काढण्यापुरते मर्यादित असतात. हे पुढारी पुढे दुसरे लग्न आहे, दुसरे काम, दुसरी मीटिंग असे सांगून जेवण न करता निघून जातात. लग्नातील अन्नाचा अपमान करतात, अशांना महत्व देणे टाळावे. जे तुमच्या कार्यात पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हजर असतील, त्यांनाच महत्व देणे गरजेचे आहे,असे काही जाणकारांनी सांगितले.
लग्नात येताना काहीजण सोबत येत असतात. परंतु, जे ओळखीचे आहेत, त्यांची नावे घेतली जातात. सोबतच्याचे नाव न घेतल्याने तो व्यक्ती लग्नात अक्षता टाकायच्या आतच मनात राग ठेऊन निघून गेल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
ग्रामीण भागात काही ठिकाणी अनेकवेळा असे आढळून येते की, लग्नाची वेळ निघून गेली, तरी महाशयांचे भाषण सुरूचअसते. या गोष्टीला देखील कुठेतरी आळा बसला पाहिजे. प्रत्येकजण काहीतरी नियोजित कामे ठरवूनच लग्नाला येत असतो. परंतु, अशा अनेक शुभाशिर्वाद देणाऱ्यांमुळे लग्नाची वेळ निघून जाते. पुढे मंडपात बसलेल्या लोकांची उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असते. लग्न लावून वेळेवर निघावे, अशी मनामध्ये कल्पना असते. मात्र हे सर्व त्यांना विनाकारण सहन कराव लागते. त्यामुळे यामध्ये देखील काहीतरी बदल करायला पाहिजे अशी ग्रामस्थांमधून चर्चा होत आहे.
लग्न समारंभाला येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा श्रीमंत असाच असतो. प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे. जेणेकरून सर्वांना समाधान वाटेल. सध्या लग्नाच्या तिथी जास्त असल्यामुळे लग्न वेळेवर संपन्न व्हायला हवं.
-विशाल नरवडे (युवा उद्योजक)
विवाहासाठी उपस्थित असणारा प्रत्येक माणूस हा वधू- वर या दोघांसाठी तितकाच महत्वाचा असतो. परंतु, फक्त प्रतिष्ठित लोकांचे स्वागत करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडत असतात. या गोष्टी जाणून बुजून घडत नाहीत. त्यामागे लग्न समारंभ लवकर उरकून प्रत्येकजण वेळेत घरी पोहचला पाहिजे हाच उद्देश असतो.
-गणेश पाचंगे (अध्यक्ष, ढोकसांगवी विकास मंच)लग्न समारंभ सुरू असताना सूत्रसंचालकाला नावे सांगताना सर्वांची सांगायला हवीत, जेणेकरून कोणी नाराज होणार नाही. परंतु, लग्न कार्य असलेल्या व्यक्तीकडे एवढी घाई असते की, तो या गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. समाजाने थोड बदललं पाहिजे म्हणजे या गोष्टी हळूहळू कमी होतील.
-दशरथ फंड (माजी सरपंच, बाभूळसर खुर्द)