पुणे: लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे. त्यानंतर खातेविभाग प्रमुखांची झालेल्या बैठकीत कामकाजात सुधारणा करण्याची तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हा परिषदेत ऐन होळीच्या दिवशी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्यासह तीन अभियंत्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषदेत या घटनेची चर्चा जोरदार सुरु आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी घटना घडली आहे. पण एकाच वेळी तिघांना पकडल्याची घटना ही जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
आठवड्यात एकदा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली जाते. झालेल्या बैठकीत लाचखोरी प्रकरणाचे पडसाद तीव्र स्वरुपात उमटल्याचे पहायला मिळाले. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे कामकाज योग्य पद्धतीने पुढे नेणे अपेक्षित असताना आपण एक पाऊल मागे जात आहोत, असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. कामे नीट करा, दर्जेदार करा. लोकांच्या तक्रारी येता कामा नये, असेही पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, दक्षिण बांधकाम विभागातील लाचघोरीच्या प्रकरणावरुन जिल्हा परिषदेमधील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. त्याचबरोबर बांधकाम आणि जलजीवन मिशन आणि अर्थ या विभागातील अधिकारी आणि अभियंते, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कामांच्या मयार्दाही समोर आल्या आहेत.
नुकत्याच घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेची मान शरमेने खाली गेली आहे. ही नाचक्की कशी भरुन काढणार हेच मोठे आव्हान गजानन पाटील यांच्यासमोर असणार आहे. लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडल्यानंतर विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सावधगिरीने काम करण्यावर भर दिला जात आहे.