दौंड, (पुणे) : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने पिलाणवाडी (ता. दौंड) येथील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. 05) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली.
हर्षदा बबन पवार (वय-17) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. बारावीचा निकाल सोमवारी (ता. 05) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज परिसरातून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी हर्षदाचे वडील बबन महादेव पवार यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा शाळेत हुशार मुलगी होती. ती पुणे येथे शिक्षण घेत होती. इयत्ता दहावीला तिला 87 टक्के गुण होते. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तिला 55 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे ती खूप नाराज होती. तिचे आईवडील, राहु बेट परिसरात रोजंदारीवर काम करणारे, घटनेच्या वेळी कामावर बाहेर होते. तिचे आजी-आजोबाही नातेवाईकांना भेटायला गेले होते, त्यामुळे हर्षदा आणि तिचा धाकटा भाऊ दोघेच घरी होते.
दरम्यान, दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर हर्षदा बराच वेळ दार उघडत नाही, असे समजल्यावर त्यांनी खिडकीतून पाहिल्यावर हर्षदाने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तात्काळ राहू येथे एका खासगी दवाखान्यात तातडीने उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी हर्षदाला मृत्यू घोषित केले.