पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच ३ हजार नव्या बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये १०० मिडी बसचा देखील समावेश आहे. सद्यःस्थितीत महामंडळाकडे सुमारे १५ हजार बसेस आहेत. आता नव्या बसेसच्या खरेदीमुळे प्रवाशांसाठी अधिक सोयीसुविधा आणि बससेवा उपलब्ध होणार आहे. या निर्णयाला एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कामगार आयुक्त ह. पि. तुम्मोड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या ज्या भागात लालपरी पोहोचू शकत नाही, अशा भागांमध्ये या मिडी बसेसची सेवा पुरवण्यात येणार आहे. १०० मिडी बसेस मुख्यतः डोंगराळ आणि अतिदुर्गम भागांमध्ये चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आदिवासी पाडे, दुर्गम गावे आणि डोंगराळ क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही एसटीची सेवा पोहोचणार आहे. या नव्या बसेसच्या खरेदीमुळे एसटीच्या ताफ्याला नवसंजीवनी मिळणार आहे. तर प्रवाशांना अधिक सक्षम, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. या नवीन ३ हजार बसेसमध्ये पूर्वीप्रमाणे ३ बाय २ आसन व्यवस्था असणार आहे. त्यामुळे प्रत्येक बसमध्ये सध्याच्या तुलनेत १५ ते १७ प्रवासी अधिक बसू शकतील. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हो व्यवस्था अधिक उपयुक्त ठरणार आहे.
विना अपपात सेवा देणाऱ्या चालकांना मिळणार रोख बक्षीस
वर्षातील २६० दिवस विनाअपघात सेवा बजवणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या राष्ट्रीय सणादिवशी सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे, वीस वर्षे विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.