संतोष पवार
पुणे: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील प्रतिविद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी ७४ पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी १ रुपया १२ पैसे वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ १ मार्चपासून लागू करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पोषण आहार योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
सद्या:स्थितीत केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुधारित आहार दरानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 6 रुपये 19 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 रुपये 29 पैसे दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 3 रुपये 83 पैसे धान्य माल पुरवण्यासाठी, तर इंधन आणि भाजीपाला यासाठी 2 रुपये 36 पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 5 रुपये 75 पैसे खर्च धान्यादी माल पुरवण्यासाठी, तर इंधन आणि भाजीपाला यासाठी 3 रुपये 54 पैसे अशाप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे .