केडगाव: परतीच्या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असतानाच शेतकऱ्यांनी खचून न जाता ऊस, मका, भुईमूग, कांदा व इतर काही तरकारी पिके घेतली. मात्र, ही पिके आता विजेच्या लंपडावामुळे पाणी देता येत नसल्याने धोक्यात आली आहेत. शेतकरीही त्यामुळे हैराण झाले आहेत.
शेतामधील विद्युत पंपांची वीज मुळातच 8 तासांची असतानाही त्या वेळेत वीज केव्हाही जाते आणि केव्हाही येते. अघोषित भारनियमनामुळे शेतकरी वैतागले आहेत. शेतीसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा सुरू असतो. मात्र, या वेळापत्रकातही कधी वीज गुल होईल आणि कधी येईल याचा भरवसा नसतो.
जलसाठा उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी या पिकांना पाणी मिळत नाही. परिणामी ऊस, कांदा, तरकारी, भाजीपाला पिके, जनावरांचा चारा आदी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे महावितरणाने चोवीस तास नाही पण कमीत कमी 12 तास तरी वीज द्यावी ती पण रेग्युलर द्यावी. अशी मागणी शेतकरी करीत आहे.
रात्रीच्या विद्युत पुरवठ्याने शेतकरी हैराण
जीव धोक्यात घालून अनेकदा शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना साप, विंचू, बिबट्या अश्या जंगली प्राणी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेतही शेतकरी जीव धोक्यात घालून रात्रीच पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपडत आहे.
आधीच उन्हाळ्याचे दिवस त्यात उन्हाचा तडाखा वाढला असून पिकं लवकर पाण्याला येतात, त्यात वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पाणी शेतात पोहचत न पोहचतं तोच लाईट गेलेली असते. त्यामुळे ज्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी एक दिवस लागतो ते या लाईटच्या लपंडावामुळे 4 दिवसात सुद्धा होत नाही. यामुळे इतर पिके आता जळू लागली आहेत. अशी परिस्थिती सध्याची होऊन बसली आहे. पाणी भरपूर आहे. मात्र, वेळेवर वीज मिळत नसल्याने अडचणी येत आहे.
-तुषार गायकवाड, वाखरी (शेतकरी)
परतीच्या पावसाने नुकसान झाले पण पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. मात्र वीज कधी गुल होईल याचा नेम नाही. विजेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
-दिलीप हंडाळ, माजी. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती
उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने तापमान वाढले असून याने विद्युत ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण वाढला असून यामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होत असून जळण्याची शक्यता वाढत आहे. यामुळे ट्रान्सफॉर्मर सामान्य तापमानावर यायला २ तास लागत असून त्यामुळे विद्युत पुरवठा करताना अडचणी येत आहे.तसेच शेतकऱ्यांची गैरसोय रोखण्यासाठी आम्ही ट्रान्सफॉर्मरला कूलर बसविण्यात आले आहे.
-विकास आल्हाट, कार्यकारी अभियंता केडगाव