उरुळी कांचन, (पुणे) : मागील काही दिवसांपासून टिळेकरवाडीसह परिसरातील कृषी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्यामुळे पिके करपू लागली आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करूनही विजेची समस्या सुटत नसल्यामुळे अखेर गुरुवारी (ता. 24) परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त केला.
विद्युत पुरवठ्याच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्यात याव्यात अशी मागणी टिळेकरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन टिळेकर यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी टिळेकरवाडीचे माजी सरपंच सुभाष लोणकर, निखिल टिळेकर, विशाल टिळेकर, टिळेकरवाडी, खामगावटेक भवरापूर, अष्टापूर, कोरेगाव मूळ व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार, टिळेकरवाडीसह परिसरातील गावात मागील एक महिन्यांपासून सिंगल फेज व थ्री फेज लाईट वेळेवर येत नाही त्यात थ्री फेज लाईट ही अचानक वाटेल त्या वेळेस वेळापत्रक देऊन, लोडशेडिंग देऊन शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे लाईट वेळेत नसल्याने पिके जळून लागली आहेत.
तरी आपण उन्हाळ्याचा विचार करता आपल्या भागाला लोड न येता पूर्ण 8 तास लोडशेडिंग न देता वीजपुरवठा सुरळीत करावा. आपली वीज पुरवठ्याची कामे 8 तास सोडून इतर वेळेत करावीत. 8 तासात वीजपुरवठा खंडित झाला तर तो वेळ जादा वाढवून देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरेगाव मूळ या उपकेंद्रावरून टिळेकरवाडी, खामगावटेक भवरापूर, अष्टापूर, कोरेगाव मूळ आदि गावांच्या गावठाण व कृषी क्षेत्राकरिता विद्युत पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विद्युत पुरवठ्यात सातत्याने बिघाड होत आहे. परिणामी दिवसा तसेच रात्रीतून होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरगुती तसेच कृषी क्षेत्रातील ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत.
विशेष म्हणजे विजेचा लपंडावाचा सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यामुळे पिकांना वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.