उरुळी कांचन, (पुणे) : डॉ. मणिभाई देसाई यांनी बायफ, निसर्गोपचार आश्रम, महात्मा गांधी सर्वोदय संघ, यशवंत सहकारी साखर कारखाना इ. संस्थांची स्थापना करून ग्रामीण विकासाची पायाभरणी केली. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधून लोकपयोगी कामे आजही चालू आहेत. असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार माऊली (आबा) कटके यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) चे भाग्यविधाते कर्मयोगी कै. मणिभाई देसाई यांच्या 105 व्या जयंती निमित्त डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (ता. 27) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार माऊली (आबा) कटके यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आमदार कटके बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्गोपचार आश्रमाचे मुख्य विश्वस्त एन.जी. हेगडे होते. दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, ज्येष्ठ माजी सरपंच ज्ञानोबा कांचन, निसर्गोपचार आश्रमाचे विश्वस्त अभिषेक देवीकर, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ.सचिन कातकाडे, उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या सदर रक्तदान शिबिरामध्ये 123 रक्तदात्यांनी सहभाग घेतला व 450 नागरिकांनी मधुमेह तपासणी, इ.सी.जी,पी.एस.ए., हिमोग्लोबिन, रक्तदाब, हाडांची ठिसूळता व मोफत तपासणीचा लाभ घेतला. 180 नागरिकांनी नेत्र तपासणीचा व मोफत चष्मे वाटप शिबिराचा लाभ घेतला. 133 लोकांनी दात्री ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित ब्लड कॅन्सर तपासणीचा लाभ घेतला.
दरम्यान, संस्थेस 31 मार्च 2025 अखेर 6 कोटी रुपये नफा झाला आहे. तसेच 312 कोटी 15 लाख ठेवी व 228 कोटी 66 लाख येणे कर्ज असून गुंतवणूक 120 कोटी 45 लाख अशी आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितली.
दरम्यान, यावेळी उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, संजय टिळेकर, खेमचंद पुरुसवाणी, ह.भ.प. जीवन शिंदे, धनसिंग पोंदकुले, अनिकेत कांचन, सारिका काळभोर, कमल कांचन, रोहिदास उंद्रे, प्रवीण दरेकर, सुभाष धुकटे, जनार्दन गोते इत्यादी व सर्व शाखांचे सल्लागार उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता काळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले.