थेऊर, (पुणे) : दारूच्या नशेत असलेला चालक प्रवासी घेऊन भरधाव वेगात जात असताना तीनचाकी रिक्षा थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कुंदन मिलच्या समोर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या रिक्षात एका लहान मुलीसह 6 ते 7 जण असल्याची माहिती अपघातात जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. सदर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी 5 प्रवाशांच्या हात, पाय आणि डोक्याला दुखापत झाली असून चालक मात्र रिक्षा जागेवर सोडून फरार झाला आहे. शनिवारी (ता. 10) दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन आसनी रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसवून वाहतूक करण्याचा नियम असताना रिक्षा चालकाने थेऊर फाट्यावरून एका लहान मुलीसह 6 ते 7 प्रवासी रिक्षात बसवले होते. रिक्षा थेऊर फाट्यावरून थेऊर गावाकडे निघाली होती. यावेळी रिक्षा ग्रामपंचायत हद्दीतील कुंदन मिलच्या समोर आली असता चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.
या अपघातात रिक्षातील प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींचा हात मोडला. काहींचा डोक्याला, तर काहींच्या खांद्याला जबर मार लागला. यानंतर मात्र, चालक रिक्षा जागेवर सोडून पळून गेला. सदर रिक्षा चालकाने दारू प्राशन केल्याची माहिती प्रवास करीत असलेल्या काही नागरिकांनी दिली. सदर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना महामार्गावरील नागरिकांच्या मदतीने विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्ग व थेऊर ते थेऊर फाटा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तीन आसनी रिक्षांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. तीन आसनी रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसवून वाहतूक करण्याचा नियम असताना रिक्षाचालक या नियमाला बगल देत रिक्षामध्ये पाठीमागे चार-पाच व चालकाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक प्रवासी बसवून धोकादायक पद्धतीने रिक्षा चालवितात. त्यामुळे संबंधित मार्गांवर सर्रासपणे असे अवैध प्रवासी वाहतुकीचे चित्र पहावयास मिळते.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष..
वाहतूक पोलिसांच्या समोरून अशा रिक्षा भरून जात असतानाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे अवैध वाहतूक करीत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात विनापरवाना रिक्षा देखील धावत आहेत. मात्र या वाहतुकीकडे पोलीस डोळेझाक करताना दिसून येत आहे.