पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलले की, पुणे जिल्हा भगवा करू. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो, तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू, असे म्हणेन, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात. तुम्ही (प्रसारमाध्यम) लावालाव्या करायचे बंद करा. तुम्ही कितीही उलटसुलट प्रश्न विचारले, तरी आम्ही (महायुती) एकत्र राहायचे ठरवले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
औंध येथील एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, एकनाथ शिदे यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी शिंदे तसे बोलले असतील, शेवटी कोणाच्या हातात सूत्रे द्यायची हे जनतेच्या हातात आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर माध्यमे घाई करतात. पोलिसांचा तपास तक्रार झाल्यानंतर सुरू होतो. गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. अशा घटना घडूच नयेत, हे बरोबर आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात तोडफोड करण्यात आली, हेही चुकीचे आहे. स्वतःला वेगळे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न अंसतो. सार्वजनिक मालमत्तेचे कोणी नुकसान करत असेल, तर त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असा न्यायालयाचा निर्णय आहे. गुन्ह्याचा तपास झाल्यावर याही प्रकरणात पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील, असे पवार यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय
राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. अधिवेशनात आता पुरवणी मागण्या मांडल्या जातील. केंद्र सरकारने त्यांच्या अंदाजपत्रकात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारदेखील आपल्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच सर्व घटकांचा विचार करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.