Jalna: जालना येथे कुत्र्यांच्या टोळीने 7 वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात चिमुरडा गंभीर जखमी झाला असून त्याला 110 टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. भवानीनगर परिसरात ही घटना घडली असून भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे बालक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षीय कार्तिक थोरात असे बालकाचे नाव आहे. भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यातही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना पदाक्ण्यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे. परंतु कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला 110 टाके दिले. दरम्यान, चिमुरड्याच्या वडिलांचे उपचारासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चिमुरड्याचे वडील खासगी टँकरवर चालक म्हणून काम करतात, आई गृहिणी असून आता थोरात कुटुंबावर आर्थिक संकट आहे.