पहलगाम: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एका भयानक दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये डोंबिवली येथील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे आणि पनवेल येथील दिलीप देसले यांचा समावेश आहे. संजय लेले शिवेसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे होते. राज्यातले एस. बालचंद्रन, सुबोध पाटील आणि शोभित पटेल यांच्यासह महाराष्ट्रातील काही पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले होते आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला आहे या घटनेमुळे जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवसातचं अमरनाथ यात्रा सुरु होणार आहे.
दरम्यान, या हल्ल्यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी तातडीने विमानाने दिल्लीत दाखल झाले. आज दिल्लीत कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. राज ठाकरे यांनीही या घटनेबाबत सोशल मिडियावरती संताप व्यक्त केला आहे.
कर्नाटकातील मंजुनाथ नावाच्या एका व्यावसायिकाचाही समावेश होता. मंजुनाथची पत्नी पल्लवी हिने एका वृत्त वाहिनीला या भयावह हत्याकांडाचा अनुभव सांगितला आणि खुलासा केला की, दहशतवाद्यांनी तिच्या पतीला तिच्यासमोर गोळ्या घातल्या, पल्लवीने मलापण मारून टाका, मला का जिवंत सोडले असे म्हंटले असता, “जा आणि मोदींना क्रूरतेबद्दल सांग” त्यामुळे तुला जिवंत सोडत असल्याचे सांगितले. पल्लवीने तिचा भयावह अनुभव एका वृत्तवाहिनीला शेअर केला आहे, तिने पुढे सांगितले की, दहशतवाद्यांनी तिला सांगितले, “आम्ही तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग.” तिने पुढे म्हटले की, दहशतवाद्यांना ती क्रूरता पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवावी असे वाटत होते.
हल्ल्यापूर्वी मंजुनाथ आणि पल्लवी यांच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे त्यांचे अनुभव सांगत आहेत आणि जम्मू आणि कश्मीरमधील विविध पर्यटन स्थळे दाखवत आहेत.