मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश (Pradnya Satav joins BJP) केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या कोट्यातून मिळालेल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या राजकीय खेळीमुळे एकाच वेळी अनेक समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा हिंगोलीची होती, जिथून राजीव सातव विजयी झाले होते. 2021 मध्ये अवघ्या 46 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र, गुरुवारी त्यांनी काँग्रेसशी सर्व संबंध तोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
प्रज्ञा सातव यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडल्याने विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले असून, त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदावरील पक्षाचा दावा देखील कमकुवत झाला आहे. विधान परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रत्येकी सहा सदस्य होते, तर विधानसभेत शिवसेना (ऊबाठा) चे 20 आणि काँग्रेसचे 16 आमदार आहेत.
काँग्रेसची इच्छा विधान परिषदेत सतेज पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड व्हावी अशी होती, तर विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने शिवसेना (ऊबाठा) ला हे पद मिळावे, असा समन्वय होता. मात्र, भाजपच्या या हालचालीमुळे काँग्रेसची रणनीती बिघडली असून, शिवसेना (ऊबाठा) ला काहीसा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, शिवसेना (ऊबाठा) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेचे सदस्य असल्याने, आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा थेट दावा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विधानसभेत शिवसेना (ऊबाठा) आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या विचारात होती. मात्र, दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते एकाच कुटुंबातील असतील, तर उद्धव ठाकरे यांना टीकेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विधानसभेतील हे पद दुसऱ्या नेत्याला देण्याची शक्यता वाढली आहे.
या घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय उद्दिष्ट साध्य झाल्याचे मानले जात असून, आदित्य ठाकरे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अडला आहे. त्याचबरोबर, काँग्रेस दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.







