सोलापूर : सोलापूर शहराला सातत्याने सतत पाणी दूषित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता दूषित पाण्यामुळेच बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टी परिसरात दोन शाळकरी मुलींना आपला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर शहरातील बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर या दुर्लक्षतचा जीवघेणा परिणाम समोर आला.भाग्यश्री म्हेत्रे आणि जिया म्हेत्रे या दोन सोळा वर्षीय शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एक मुलगी अजूनही गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आता सोलापूरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे या मुलींचा मृत्यू झाला असल्याचा आरोप देखील केला जात आहे.
या घटनेनंतर भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करून यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.