नागपूर : नागपुरात सोमवारी (ता. 17 ) दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली.या हिंसाचारात एक जणाचा मृत्यू झाला होता. 20 दुचाकी, 40 चारचाकीचे आणि 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. अनेकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात 105 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपूर शहरातील संचारबंदी आज दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवली असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.
नागपूर शहरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. हिंसाचार ग्रस्त भागात पोलीस बंदोबस्तामुळे वर्दळ थांबली होती. परंतु आता नागपूर पोलिसांनी सहा दिवसानंतर संचारबंदी उठवली असल्यामुळे शहर पूर्वपदावर येत आहे. नागपुरात बाजारपेठही सुरु झाली आहे. वर्दळ सामान्य होऊ लागली आहे. नागपूर पोलिसांनी संचारबंदी उठवली असली तरी पोलीस परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. महाल, गांधीबाग, इतवारी या भागात नागपूर शहरातील मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठ आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष आहे. नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी सुमारे 250 कोटींचा व्यापार प्रभावित झाला.
दरम्यान शहरातील संचारबंदी उठवली असली तरी काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे. संवेदनशील ठिकाणी हा बंदोबस्त असणार आहे. तसेच परिस्थिती पाहून बंदोबस्तात बदल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.