मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात देशाच्या 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.हल्लेखोर दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांनाच लक्ष्य केलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे.सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा कधीही भरुन निघणार नाहीत, अशा आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर अतिरेक्यांकडून पुन्हा मुंबईवर लक्ष्य केलं जाऊ शकतं. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याआधीच्या हल्ल्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर (सीएमएमटी) येऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला असून एनआयएकडून तपासाला वेग आला आहे. सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था ठेवली जाणार आहे.