पुणे : राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज (ता. १९) मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश, उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे.
दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर मध्य महाराष्ट्रापासून मराठवाडा, कर्नाटक, रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ आकाश होत असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.
शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानच्या बिकानेर येथे देशातील उच्चांकी ४५.१ अंश तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे ४३ अंश, तर जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती आणि वाशीम येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.