मुंबई : गेल्या काही काळापासून मुंबईसह संपूर्ण देशात सायबर गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता एका कॉलेज तरुणीच्या खात्यात सायबर भामट्यानीं तब्बल 35 कोटीचे व्यवहार केले असल्याची माहिती समोर आली आहे.आयकर विभागाने जीएसटी भरण्यासाठी तरुणीला नोटीस पाठवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड वेस्ट परिसरात राहणाऱ्या एका कॉलेजच्या तरुणीच्या खात्यात तब्बल 35 कोटींचे व्यवहार सायबर भामट्याने केले होते.पण याची काहीच कल्पना त्या तरुणीला नव्हती. आयकर विभागाने तरुणीला नोटीस पाठवली त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.बँक खात्यात ३५ कोटींचे व्यवहार झाले, याबाबत टॅक्स भरावा, असं नोटीसमध्ये म्हटलं होतं. ही नोटीस पाहून तरुणीला घाम फुटला. तिने तातडीने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपण कॉलेजची विद्यार्थिनी असून आपल्या खात्यात एवढे पैसे नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता तरुणीच्या कागदपत्राचा वापर करून त्यांनी बँक खात उघडल्याच समोर आलं. तसेच हे बँक खातं फसवणुकीचे पैसे जमा करण्यासाठी वापरलं जात होतं. सायबर फसवणूक केल्यानंतर खंडणी जमा करण्यासाठी या खात्याचा वापर केला जात होता अशी माहिती तपासात समोर आली.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कांदिवली आणि बोरिवली परिसरातून दोघांना अटक केली आहे . अभिषेक पांडे आणि आकाश विश्वकर्मा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.