पोपटराव पाचंगे
रांजणगाव गणपती : कारेगाव, ता.शिरुर येथे दर रविवारी भरत असलेल्या आठवडे बाजारात शेतमाल विक्रीकरिता घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणताही संबंध नसताना केवळ जागेच्या भाड्यापोटी जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या ६ ते ७ जणांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निलेश यशवंत वाळुंज, रा.अण्णापूर यांनी रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.येथील आठवडे बाजार हा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जागेतील रस्त्याच्या कडेला भरत असून,गेल्या रविवारी(ता २३) वाळुंज हे आपली आई मंदा वाळुंज यांच्यासह स्वतःच्या शेतातील कोबी विकण्यासाठी आले होते. सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे तालुका पदाधिकारी सोमनाथ उर्फ बंटी नवले हा ६ ते ७ साथीदार यांच्या समवेत आला. त्यापैकी नवले हा फिर्यादी वाळुंज यांच्या आईला येथे बसायचे असेल तर तुला ५० रुपये द्यावे लागतील. फिर्यादीच्या आईने पैसे देण्यास नकार दिला म्हणून नवलेने आईच्या हातातील पन्नास रुपयांची नोट दादागिरीने घेतली. तसेच दादागिरी करणाऱ्या ६ ते ७ जणांच्या टोलक्याने अन्य शेतकरी आणि विक्रेते यांच्याकडून ही दमदाटी करुन जबरदस्तीने ४०,५० आणि १०० रुपये अशा पेटीत बेकायदेशीरपणे पैशाची वसुली केली. त्यामुळे शेतकरी व व्यापारी भयभीत झाले.
काही शेतकऱ्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर हे टोळके त्यांचा भाजीपाला घेऊन गेले. या घटनेला शेतकऱ्यांनी विरोध केला असता नवले याने ही जागा सरकारने आम्हाला वापरायला दिली आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने या टोळक्याला उद्देशून मी पोलिसांना कळविले आहे, असे म्हणाले असता सोमनाथ उर्फ बंटी नवलेसह अन्य ६ ते ७ जणांनी दादागिरी करत तुम्हाला कोणाला कळवायचे असेल ते कळवा, पोलिसांना आम्ही घाबरत नाही. तसेच फिर्यादीला उद्देशून तुला पण बघून घेईल, असे म्हणत दादागिरी करत जबरदस्तीने पैसे वसूल करून निघून गेले.याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.