अहिल्यानगर: इंस्टाग्रामवरील मेसेज वरून वाद होऊन एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ गोरक्षनाथ काकड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत साईनाथ गोरक्षनाथ काकड( ता, राहता, रा. डोऱ्हाळे) आणि रूपाली संजय लोंढे ( ता. कोपरगाव रा. कोकमठाण) हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. ते दोघेही पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते.
दरम्यान, एका दिवशी साईनाथ याने रूपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवरुन मेसेज करत शिवीगाळ केली. यानंतर रूपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसणे, पवन कैलास आसणे आणि राहुल अशोक चांदर यांनी शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी पुण्यात साईनाथ राहत असलेल्या घरी जाऊन त्याला बळजबरीने ओढून आपल्या चार चाकी गाडीत टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आणले. तेथे त्याला अमानुषपणे मारहाण करून विषारी औषध पाजून साईनाथचा खून केला. असे महेश गोरक्षनाथ काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणातील चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, भूषण हांडोरे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 251/2025 कलम 103(1), 140(1), 189(2), 191(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहेत.