मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, निकी विक्की भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनियर या निर्मात्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. मात्र आता या चित्रपटाच्या घोषणेनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ हा चित्रपट २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ६ आणि ७ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम- नितीन करणार असून, त्याच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक महिला सैनिक वर्दीत, हातात रायफल घेऊन, आपल्या कपाळावर सिंदूर लावताना दिसते. पोस्टरमध्ये टँक, काटेरी तार आणि आकाशात उडणारी लढाऊ विमानेही दाखवण्यात आली आहेत, ज्यामुळे शौर्य, बलिदान आणि देशभक्तीचा संदेश दिला जातो. या चित्रपटाचे पोस्टर मानव मंगलांनी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. पण काही वेळानंतर ते हटवण्यात देखील आले.
या चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या चित्रपटाच्या घोषणेला राष्ट्रभक्तीचा अभिमान मानले, तर काहींनी या घोषणेला ‘असंवेदनशील’ आणि ‘व्यावसायिक फायद्यासाठी केले असल्याची टीका केली आहे