जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. या हल्ल्यात भारताने दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उध्वस्त केली आहेत. त्यानंतर पाकिस्ताननं सीमेवर बेछूट गोळीबार सुरू केला. दरम्यान भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता, लष्करातील जवानांची सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील लग्नाच्या सुट्टीवर आले असताना, लग्नानंतरच्या तिसऱ्याच दिवशी त्यांना कर्तव्यावर रुजू व्हावं लागलं. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, अशी प्रतिक्रिया नववधूनं दिली आहे.
देशसेवेच्या कार्यासाठी मनोज पाटील भारतीय सैन्यात भरती झाले. मनोज पाटील यांचा विवाह नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी 5 मे रोजी झाला.लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते.पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित हजर राहण्यास सांगितलं. अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झालेत. दरम्यान, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसांत मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले.