छत्रपती संभाजीनगर: नागपूरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस कारवाई करत आहेत. या हिंसाचारावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते नागपूरमधील हिंसाचारावर भाष्य करताना म्हणाले, “सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही.. काढायची असती तर त्यांनी कबरीच्या दिवाबत्तीला पैसे व पोलिस बंदोबस्त दिला नसता.
संभाजीनगरमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. हे (राजकारणी) मात्र जाती जातींमध्ये भांडण लावून आपले राजकारण करीत आहेत. मुख्यमंत्री सोंगाड्या आहे त्यांच्या सोंगात आता जनतेने फसू नये. असे आवाहन जरांगेंनी केले. यावेळी बोलताना म्हणाले, राज्यात इतर ठिकाणी जनतेने औरंगजेबाच्या कबरीच्या विषयाला महत्व दिले नाही. म्हणून त्यांनी (मुख्यामंत्री) आपल्याच घरात दंगल पेटवली आहे. असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.