मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार असलेल्या रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने बुधवार, 7 मे रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटला निरोप दिला. रोहितच्या निवृत्तीची बातमी अशा वेळी आली जेव्हा निवड समितीने त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती.
रोहितने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या 280 क्रमांकाच्या कसोटी कॅपचा फोटो पोस्ट केला. यासोबतच त्याने निवृत्तीची घोषणा केली. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या (कपड्यांमध्ये) माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. इतक्या वर्षांपासून तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.” तथापि, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहितने स्पष्ट केले की तो सध्या एकदिवसीय स्वरूपात खेळत राहील. तो म्हणाला, “मी एकदिवसीय स्वरूपात भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन.”