उरुळी कांचन,ता.3: जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे व्हावा, यासाठी कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत प्रशासनानं गेल्या वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तानी गावाची पाहणी केली. त्यानंतर परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे निश्चित केले आहे. या वेळी पालखी सोहळा अध्यक्ष जालिंदर मोरे महाराज, सरपंच हरेश गोठे, पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, सागर निगडे, बाप्पू घुले, गजानन जगताप, काळूराम कुंजीर, नवनाथ आंबेकर उपस्थित होते.
परांपरेप्रमाणे देहू येथून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे तीन दिवसानंतर पुणे-सोलापूर महामार्गवरील लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती येथे पालखीचा रात्रीचा मुक्काम असतो. त्यानंतर परतीचा रात्रीचा मुक्काम उरुळी कांचन येथे असायचा. परंतु, सोहळा प्रमुखांनी यात बदल करून पालखीच्या परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी उरुळी कांचन गावामधील पालखीचा विसावा रद्द करून, तो उरुळी कांचन फाट्यावर होईल, असे पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी याबाबत उरुळी कांचन ग्रामस्थांचे पोलिस प्रशासन व विश्वस्तांशी वाद झाले होते. तेंव्हा ग्रामस्थांनी पालखी अडवली. त्यावेळी विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शविला होता. यामुळे, वैष्णव भक्तांना निराशेला सामोरे जावे लागले होते.