उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात मृतदेहाला लाल मुंग्या लागल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असतानाच, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मृतदेहाच्या कथित विटंबनेसाठी रुग्णालय प्रशासन नव्हे, तर पोलिसांच्या दिरंगाईमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप हवेली तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोरे यांनी केला आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मनीष शांताराम कांचन (वय 40, रा. कुंभार आळी, उरुळी कांचन) यांनी शुक्रवारी (ता. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तयारी पूर्ण केल्याचे सांगितले जात असताना, शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रक्रियेला विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली नाही. रात्र उलटून सकाळ झाली, तरी मृतदेह तसाच पडून राहिला. अखेर संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन कक्षात जाऊन पाहणी केली असता मृतदेहाच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि जखमांवर लाल मुंग्या लागल्याचे दृश्य दिसून आले. या प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, हवेली तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोरे यांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची माहिती रात्रीच मिळाली होती. मात्र, शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेला पोलिसांचा अधिकृत पंचनामा उरुळी कांचन पोलिसांकडून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रुग्णालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे जवळपास नऊ तास शवविच्छेदन प्रक्रिया रखडून राहिली.
“पोलिसांच्या अधिकृत पंचनाम्याशिवाय डॉक्टरांना शवविच्छेदन करता येत नाही. त्यामुळे पंचनामा उपलब्ध होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी कायदेशीरदृष्ट्या प्रतीक्षा करण्यास बांधील असतात. त्यामुळे मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षात ठेवावा लागला,” असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आत्महत्येची माहिती पोलिसांना तातडीने दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर पंचनामा तयार करण्यात एवढा विलंब का झाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी संबंधित महिला डॉक्टर वेळेवर रुग्णालयात पोहोचल्या नाहीत, तसेच मृतदेहाचे कपडे काढून ठेवण्यास सांगून त्या अनुपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार वारंवार फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद न दिल्याने त्यांची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.
चूक नेमकी कोणाची? खाकीची की पांढऱ्या कोटाची?
एकीकडे नातेवाईकांनी महिला डॉक्टर वेळेवर आल्या नसल्याचा आणि मृतदेहाचे कपडे काढून ठेवण्यास सांगून अनुपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागाने पोलिसांच्या ढिसाळ कारभाराकडे बोट दाखवले आहे. या दोन शासकीय विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे अखेर एका मृत व्यक्तीच्या पार्थिवाची अशी दुर्दैवी अवस्था झाली, हे मात्र निर्विवाद आहे. आता या संवेदनशील प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा आरोग्य प्रशासन कोणती भूमिका घेणार? दोषी पोलिसांवर आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण हवेली तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.







