विशाल शिंदे

पुणे : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या ऐतिहासिक राजगडावर सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाच्या कारभारावर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छतेच्या नावाखाली २० ते ३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. मात्र, या मोबदल्यात पर्यटकांना मूलभूत सुविधा आणि स्वच्छता मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

नुकतीच भोर येथील रहिवासी ॲड. रोहित चव्हाण यांनी गडाला भेट दिली असता, प्रवेशद्वारावर लहान मुलांमार्फत तिकिटांची वसुली केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय, पुरातत्त्व विभागाने उभारलेल्या शौचालयांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि प्रचंड दुर्गंधी पसरली होती. ऐतिहासिक वास्तूची ही अवस्था पाहून ॲड. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत शौचालयांची साफसफाई केली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगडावरून दरमहा लाखो रुपयांचा महसूल गोळा केला जातो. परंतु, हा निधी नेमका जातो कुठे? नियमित साफसफाई, पिण्याचे पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या साध्या सुविधाही पर्यटकांना का मिळत नाहीत? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. केवळ पैशांची वसुली करण्यावर भर देणाऱ्या वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाने या निधीचा हिशोब जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
राजगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि वैभवाचा प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी अशी दुरवस्था असणे अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन गडावर स्वच्छता व्यवस्था कायम ठेवावी, तसेच या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवभक्त व पर्यटकांकडून केली जात आहे.






