उरुळी कांचन, ता. 15 : उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते शंकर पांडुरंग पाटील (वय -48) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सोशल मीडियावर टाकलेल्या चिठ्ठीत “माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये” असा मजकूर लिहून त्यांनी जीवनयात्रा संपवली.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रम रोड, उरुळी कांचन येथील राहत्या घरात सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. पाटील यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत मानसिक धक्क्यामुळे आपण खूप व्यथित असल्याचे नमूद केले असून इच्छामरणाची परवानगी मिळत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख आढळून आला आहे.
शंकर पाटील हे अविवाहित होते. ते कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय होते. परिसरात आयोजित होणारे सामुदायिक विवाह सोहळे, आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी अन्नदान सेवा अशा विविध उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होत होते.
दरम्यान, त्यांच्या आकस्मिक निधनाने उरुळी कांचन परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद उरुळी कांचन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







