बीड: मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात आता नवं वळण मिळत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी गंभीर दावा करत, केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आले होते, असे सांगितले आहे. (Beed News)
धनंजय देशमुख, त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीत मस्साजोग गावातील चोरी, घरफोडी आणि इतर विषयांवर चर्चा झाली.

दरम्यान, दादासाहेब खिंडकर यांनी यापूर्वीच दावा केला होता की, त्यांच्या विरोधातील गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणात समेट करण्याचा प्रयत्न झाला. या दाव्याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.
धनंजय देशमुख म्हणाले की, “हे प्रकरण मिटवण्यासाठी मला एका ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. एका साक्षीदाराने संपर्क साधून प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र मी त्या ठिकाणी गेलो नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “मी 13 महिन्यांनंतर याबाबत बोलत आहे. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण मी न्यायासाठी लढत राहणार आहे.”
दुसरीकडे, दादासाहेब खिंडकर हे 13 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटले असून त्यांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, जुन्या व्हिडिओच्या आधारे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुख प्रकरण मागे घ्यावे असा प्रस्ताव देण्यात आला होता.
खिंडकर यांनी काही लोकांवर नशा करून गावात दहशत निर्माण केल्याचा आणि खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही केला आहे.
या सर्व दाव्यांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील तपासात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







