उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा सावकारी आणि छळाप्रकरणी तक्रार नोंदवण्याचे काम सुरू असतानाच आरोपींच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांनी थेट पोलीस ठाण्यात घुसून ‘हाय-व्होल्टेज’ राडा घातला. पोलिसांच्या देखतच हा गोंधळ आणि हुज्जत सुरू असल्याने उरुळी कांचन पोलिसांच्या नाकर्तेपणाची आणि ढिम्म कारभाराची आब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेने 3 लाख 14 हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल 10 लाख 84 हजार रुपये परत केले होते. तरीही सावकारांची हाव मिटली नव्हती आणि ते आणखी पैशांसाठी या महिलेला सतत धमकावत होते. या त्रासाला कंटाळून पीडित महिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली.

मात्र, कायद्याचे राज्य असलेल्या पोलीस ठाण्यातच आरोपींच्या समर्थक महिलांनी धुमाकूळ घातला. पोलिसांच्या उपस्थितीतच तक्रारदार महिलेवर दबाव आणण्याचा आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून उरुळी कांचन पोलिसांची पुरती नाचक्की झाली आहे.

पोलीस ठाण्यात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना, पोलीस मात्र हतबल प्रेक्षक बनल्याचे चित्र होते. अशा वेळी सामाजिक कार्यकर्त्या एका महिलेने धैर्याने पुढे येत तक्रारदार महिलेला धीर दिला. आरोपी समर्थकांचा सर्व दबाव झुगारून लावत त्यांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यासाठी मदत केली.
“जर कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या नाकाखाली, थेट पोलीस ठाण्यात घुसून गुन्हेगारांचे समर्थक असा धिंगाणा घालत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायला जायचे कोणाकडे? उरुळी कांचन पोलिसांचा गुन्हेगारांवर काडीचाही धाक उरलेला नाही का?” असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
याबाबत उरुळी कांचनच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
दरम्यान, या घटनेचे पडसाद आता संपूर्ण पुणे जिल्ह्यात उमटू लागले असून उरुळी कांचन पोलिसांच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका होत आहे. चक्क पोलीस ठाण्यातच कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील हलगर्जी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








