छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी आयुष्य संपवल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नातेवाइकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबीयांकडून कुणालची आई संगीता यांच्यावर आरोप करण्यात येत असताना आता त्यांच्या बहिणी पल्लवी यांनी समोर येत चांदगुडे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. मुरलीधर आणि संगीता यांच्या लग्नापासूनच कुटुंबात संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, संगीता आणि मुरलीधर यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना आदित्य हा पहिला मुलगा होता. लग्नानंतर सुरुवातीला मुरलीधर यांच्या कुटुंबीयांनी हे लग्न मान्य केले नव्हते. त्यानंतर दोघांना शेती मिळाली आणि त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत असताना संगीता यांनी मुलांना पाठीला बांधून अनेक वर्षे शेती केल्याचा दावा पल्लवी यांनी केला.

मात्र, सुमारे १४ वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा आदित्य याचा मृत्यू झाला. या घटनेचा संगितावर मोठा मानसिक परिणाम झाला होता. मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून त्या सावरू शकत नव्हत्या. मुलाला शोधण्यासाठी त्या रात्री-अपरात्री शेतात जात असल्याचेही पल्लवी यांनी सांगितले.

आदित्यच्या मृत्यूनंतर संगीता आणि मुरलीधर काही दिवस माहेरी आले होते. त्याच काळात मुरलीधर यांच्या वडिलांनी मुलींना जमिनीचा काही हिस्सा दिला होता. यामुळे मुरलीधर नाराज असल्याचे पल्लवी यांनी सांगितले.
दरम्यान, संगीता यांना पतीचा अनेक वर्षे त्रास होता, असा आरोप केला जात असला तरी त्यांनी हा दावा फेटाळला. जर आपल्या बहिणीला मुरलीधर यांचा इतका त्रास असता, तर पती आणि मुलाच्या मागे त्यांनी स्वतःही टोकाचे पाऊल उचलले नसते, असे पल्लवी यांनी म्हटले.
तसेच मुरलीधर यांच्या नातेवाइकांकडून संगीता आणि कुणाल यांच्या मृत्यूबाबत पुरेसे दुःख व्यक्त झाले नाही, असा आरोपही त्यांनी केला. मुरलीधर यांच्या मृत्यूचेच अधिक दुःख असल्याचे दिसून आल्याने आम्हाला ही बाब अत्यंत वेदनादायी वाटली, असे पल्लवी यांनी सांगितले. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे खवड्या डोंगरावरील घटनेनंतरचा कौटुंबिक वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.







