पुणे: पेपरफुटीच्या आरोपांनी चर्चेत आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आणि त्यानंतरच्या पोलीस तपासाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला.

या परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याच्या तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका विशिष्ट उमेदवाराला परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा त्याला प्रत्यक्ष फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती आहे.

परीक्षेतील गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये आणि भरती प्रक्रियेची पारदर्शकता कायम राहावी, यासाठी संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या भरतीसाठी यापूर्वी झालेली परीक्षा आता ग्राह्य धरली जाणार नाही.

आता या पदांसाठी एमपीएससीकडून पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या उमेदवारांनी यशस्वीपणे अर्ज केला आहे, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवीन तारीख आणि इतर तपशील आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आणि विद्यार्थी संघटनांकडूनही आवाज उठवण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीचा आरोप केला होता. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊनही आपली भूमिका मांडली होती. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोरही एका विद्यार्थिनीने या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर अखेर एमपीएससीने परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.







