उरुळी कांचन, ता. 21 : बहुचर्चित कोरेगाव मूळ-केसनंद जिल्हा परिषद गटातून सुरेखा रमेश हरगुडे यांना तर पंचायत समिती गणातून कृषिराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी, व प्रमोद चंद्रकांत हरगुडे यांना राष्ट्रावादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरेगाव मूळ गणात कृषीराज चौधरी यांना उमेदवारी मिळाल्याने कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात एकच खळबळ उडाली असून परिसरात तर्क वितर्क लावले जात आहेत.
उमेदवारी नाकारल्याने पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी कोणता राजकीय विस्फोट करणार की तटस्थ राहणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सुरज चौधरी यांनी कोरेगाव मूळ या गणातून मोठी तयारी केली होती. ऐनवेळेस त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने परिसरात विविध चर्चांना उधान आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरज चौधरी यांनी जनसंपर्क, बैठका आणि विकासकामांच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवाराला डावलल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून हवेली तालुका अध्यक्ष गणेश चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर गणातून अद्याप उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली आहे.







