पुणे: पुणे शहर आणि परिसरात अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीत चार विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून या सर्व प्रकरणांमध्ये कौटुंबिक छळ, पैशांची मागणी आणि हुंड्यासाठी होणारा मानसिक व शारीरिक त्रास हे समान धागे असल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनांमुळे पुण्यात खळबळ उडाली असून संबंधित पोलिस ठाण्यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

पहिली घटना चंदननगर परिसरातील तुकारामनगर येथे 3 जून रोजी घडली. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय 25) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारीनुसार, कार आणि घर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला जात होता. या प्रकरणी पती गोरख सोनवणे याला अटक करण्यात आली असून सासू-सासऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना वाघोली येथे घडली. प्रियांका गणेश कांबळे (वय 25) यांनी 1 जून रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पैशांच्या मागणीसह होत असलेल्या कथित छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती गणेश कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
कोंढवा खुर्दमधील साईबाबानगर येथे 31 मे रोजी तिसरी घटना घडली. मिसबा एजाज कुरेशी ताडे (वय 21) यांनी आत्महत्या केली. लग्नावेळी अपेक्षित हुंडा न मिळाल्याच्या कारणावरून छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथी घटना आंबेगाव परिसरात घडली. 20 वर्षीय विवाहितेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले. प्रेमविवाहानंतरही हुंड्याच्या मागणीसाठी छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या 72 तासांत घडलेल्या या चार घटनांमुळे कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.






