पुणे: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे. शहरात लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित 500 अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी मुंबईच्या धर्तीवर आधुनिक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित ‘पुणे ट्रॅफिक परिषदेत’ ते बोलत होते. यावेळी वाहतूक विभाग, पीएमपी, मेट्रो आणि परिवहन विभागातील अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मनोज पाटील यांनी सांगितले की, पुण्यातील वाहतूक कोंडी ही केवळ रस्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नसून तिचा नागरिकांच्या आरोग्यावर आणि मानसिक तणावावरही परिणाम होत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीवर भर दिला जात आहे.
शहरात बसवण्यात येणारे AI कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची स्वयंचलित नोंद घेतील आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय दंडात्मक कारवाईची प्रक्रिया राबवतील. याशिवाय वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) प्रकल्प तयार करण्यात आला असून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
यावेळी आगामी काळात पुण्यात मेट्रोचे सुमारे 100 किलोमीटरचे जाळे उभे राहणार असल्याचा उल्लेख करत आधुनिक वाहतूक यंत्रणा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मेट्रो प्रशासनाच्या वतीने मिहीर कुलकर्णी यांनी सांगितले की, मेट्रो स्थानकांजवळ दुचाकींसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शहरात पुन्हा ‘बस डे’ उपक्रम राबवण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.






