राहुलकुमार अवचट

यवत, (पुणे) : सासरच्या लोकांकडून होणारा शारीरिक, मानसिक छळ व बेदम मारहाण आणि स्वतःच्या सासऱ्यानेच टाकलेली वाईट नजर या त्रासाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी अजिंक्य कांबळे (वय 25, रा. डाळिंब, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. 09) सकाळी साडेआठ वाजता घडली.

पती अजिंक्य भाऊसो कांबळे, सासरे भाऊसो कांबळे, सासू लक्ष्मीबाई कांबळे, दीर स्वप्नील भाऊसो कांबळे, अजिंक्यच्या आत्याचा मुलगा, शेखर भोसले रा. डाळिंब, ता. दौंड), कदम (पूर्ण नाव माहीत नाही, उरुळी कांचन येथील मध्यस्थी सासऱ्याचा मित्र) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. याबाबत मुलीची आई आशा संतोष साबळे (वय -45, रा. देवाळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा साबळे यांची मोठी मुलगी वैष्णवी हिचे लग्न 15 जून 2022 रोजी डाळिंब येथील अजिंक्य कांबळे याच्याशी झाले होते. सुरुवातीला संसार सुरळीत चालला होता; मात्र काही दिवसांतच पती अजिंक्य याला दारूचे व्यसन जडले आणि त्याचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध सुरू झाले. यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाले.
दारू पिऊन पती अजिंक्य हा वैष्णवीला “तुझे आईने लग्नामध्ये काही दिले नाही, लग्नाचा सगळा खर्च आम्हीच केला” असे टोमणे मारून मारहाण व छळ करू लागला. तसेच वैष्णवीचे सासरे भाऊसाहेब कांबळे हे देखील वैष्णवीवर वाईट नजरेने बघत असत आणि तिला मानसिक त्रास देऊन मारहाण करत असत. असे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता वैष्णवीने आईला फोन केला. तिने सांगितले की, रविवारी मला व जाऊला सासू, सासरे, आणि पती हे वारंवार मारहाण करतात असे सांगितले होते. असे सांगितल्याने भांडण मिटवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी आणि मध्यस्थीने बेदम मारले होते. त्यामुळे वैष्णवी बेशुद्ध पडली होती. तसेच उपचारासाठी दवाखान्यातही नेले नाही.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी आशा साबळे या मुलीला भेटण्यासाठी डाळिंब येथे जाण्यास निघाल्या. त्या देवळाली प्रवरा बसस्टँडवर असतानाच जावई अजिंक्य कांबळे याचा फोन आला आणि त्याने “तुम्ही इकडे येत आहात का? वैष्णवीने फाशी घेतलेली आहे,” असे सांगितले. फिर्यादी तात्काळ बसने यवतच्या सरकारी दवाखान्यात पोहोचली; मात्र तोपर्यंत वैष्णवीचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, मृत वैष्णवीला संगनमताने वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून, गंभीर मारहाण करून आणि शारीरिक-मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी यवत पोलिसांनी पती, सासू, सासरे, दीर, व अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत.







