पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अमित कुमार नावाच्या स्थानिक तरुणाने ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर घडलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर 8 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाची एक मोठी सभा पार पडली होती, ज्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या सभेनंतर एका स्थानिक हिंदू संघटनेने त्या जागेवर शुद्धीकरण विधी केला. मैदानातील अस्वच्छता दूर करण्यासाठी आणि तिथे दिलेल्या घोषणांचा निषेध म्हणून हे शुद्धीकरण केल्याचा दावा आयोजकांनी केला. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे हे दलित समाजाचे असल्याने काँग्रेसने या विधीला तीव्र विरोध दर्शवला.

या घटनेनंतर राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. हा शुद्धीकरण विधी म्हणजे दलितविरोधी मानसिकतेचे लक्षण असून यामुळे दलितांच्या अस्मितेला ठेच पोहोचली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. राहुल गांधींच्या या भूमिकेवर आक्षेप घेत अमित कुमार यांनी पोलिसांत धाव घेतली. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

या तक्रारीची दखल घेत हल्द्वानी पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 196 व 299 अन्वये तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 च्या कलम 3(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे उत्तराखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.






