पुणे: पूर्व पुण्यातील रहिवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेने शहरात पाणीकपातीचे धोरण अंमलात आणले असले, तरी पूर्व पुण्यातील नागरिकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे. भामा आसखेड धरणाद्वारे ज्या भागांत पाणीपुरवठा केला जातो, त्या क्षेत्रांना आता ‘एक दिवसाआड’ पाणीकपातीतून वगळण्यात आले आहे. पालिका आयुक्तांनी तत्काळ प्रभावाने या भागातील पाणीकपात रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या ४ आठवड्यांपासून पूर्व पुण्यातील नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे, हे या निर्णयामागचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय, नुकत्याच खेड तालुक्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, ज्याचा मोठा फटका येथील पाणीपुरवठा यंत्रणेला बसला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या या समस्यांचा गांभीर्याने विचार करून आयुक्तांकडे पाणीकपात न करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून, जोपर्यंत नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे सुरू होत नाही, तोपर्यंत पाणीकपात करू नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
वडगावशेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 1 ते 6 मधील नागरिकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यामध्ये विमाननगर, नगर रस्ता परिसर, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी, वडगावशेरी, म्हाडा कॉलनी आणि यमुनानगर यांसारख्या मोठ्या परिसरांचा समावेश आहे.







